
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पोलिस श्वानाबाबत संवेदनशील निर्णय…
मुंबईः पोलिस दलात 10 वर्षांची अखंड सेवा बजावल्यानंतर निवृत्त होणाऱ्या श्वानांच्या उर्वरित आयुष्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील निर्णय घेतला आहे. पोलिस दलातील सेवा पूर्ण झाल्यानंतरही हे श्वान आता पोलिसांसोबतच राहतील. त्यांच्या भोजनाचा आणि इतर सांभाळाचा सर्व आर्थिक भार गृहविभाग उचलणार आहे.
पोलिस दलात 10 वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर श्वान निवृत्त होतो. या 10 वर्षांच्या प्रदीर्घ काळात त्या श्वानाला त्याच्या रखवालदारासोबत राहण्याची आणि भोजनाची सवय जडलेली असते. त्यांच्यात एक आपुलकीचा आणि विश्वासाचा बंध निर्माण होतो. आतापर्यंत निवृत्तीनंतर अशा श्वानांना इतर ठिकाणी दत्तक दिले जायचे. परंतु, आपल्या नियमित साथीदारापासून आणि वातावरणापासून दुरावल्यामुळे या श्वानांचे मानसिक स्वास्थ्य बिघडायचे आणि अनेकदा ते अन्नत्याग करायचे.
View this post on Instagram
पोलिस दलाला आपल्या आयुष्याची 10 वर्षे सेवा दिल्यानंतर निवृत्तीच्या काळात श्वानांचे असे हाल होणे योग्य नाही. तो श्वान असला तरी त्याच्या सेवेचा आदर करत त्याची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे, अशी ठाम भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली. त्यांच्या पदरी निवृत्तीनंतर दुःखाचे जीवन येऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, या निर्णयामुळे 10 वर्षे सेवा देऊन निवृत्त झालेला श्वान पोलिस विभागासोबतच राहणार आहे. यामुळे त्याच्या रखवालदारासोबतचे ऋणानुबंध कायम राहतील आणि त्याचे उर्वरित आयुष्य सुखकर व आनंदी जाईल. श्वानांच्या भोजनासाठी आणि देखभालीसाठी येणारा सर्व आर्थिक भार गृहविभाग उचलणार आहे. केवळ दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचीच नव्हे, तर पोलिस दलाचा मुख्य भाग असलेल्या प्रामाणिक श्वानांच्याही उर्वरित आयुष्याची काळजी घेणाऱ्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.
पोलिस भरतीसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची माहिती…
Video: पुणे पोलिसांना 25 लाखांचे पारितोषिक : देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारकडून निधी मंजूर…
मुख्यमंत्री फडणवीसांची महाराष्ट्र पोलिसांसाठी मोठी घोषणा…

