
पुण्यातील नामांकित IT कंपनीत नेमकं काय घडलं? रात्रीत गेले 700 जणांचे जॉब…
पुणे: हिंजवडीतील एका मोठ्या IT कंपनीने अचानक कार्यालयाला टाळे ठोकून पळ काढल्याने शेकडो सॉफ्टवेअर इंजिनिअर्स, फ्रेशर्स आणि इंटर्न्स एका झटक्यात बेरोजगार झाले आहेत. कंपनीने कर्मचाऱ्यांचे पगार आणि इंटर्न्सची कष्टाची डिपॉझिट रक्कम थकवून पोबारा केल्याने आयटी क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा सर्व धक्कादायक प्रकार हिंजवडी फेज-२ मधील ‘गेराज इम्पेरियम राईज’ या इमारतीतून कार्यरत असलेल्या ‘थिंक टेक्नॉलॉजी इंडिया’ या आयटी कंपनीत घडला आहे. कंपनीमध्ये गेल्या फेब्रुवारी महिन्यापासूनच कर्मचाऱ्यांचे पगार रखडण्यास सुरुवात झाली होती. कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाकडे याबाबत विचारणा केल्यानंतर कंपनीचे संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) हर्षल ठाकरे आणि एचआर विभागाने ‘कंपनीचे इंटरनल ऑडिट सुरू आहे’ असे कारण पुढे केले.

Discount Price : 165 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
कंपनीला अचानक टाळे लागल्याचे पाहून कर्मचाऱ्यांना मोठा झटका बसला आहे. एका पीडित आयटी कर्मचाऱ्याने सांगितलं, की “थिंक टेक्नॉलॉजी कंपनीच्या एचआर विभागाने मला पगारापोटी १५ हजार रुपयांचा चेक दिला होता. मात्र, तो बँकेत जमा केला असता ‘बाऊन्स’ झाला. कंपनीचा मालक हर्षल ठाकरे कोट्यवधी रुपये घेऊन गायब झाला. ही सर्व माहिती असूनही एचआर विभागातील अधिकारी मूग गिळून गप्प बसले आहेत. आमचे चार महिन्यांचे नुकसान झाले असून पोलिसांत तक्रार करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही.”
फोरम ऑफ आयटी एम्प्लॉईजचे (FITE) सरचिटणीस प्रशांत पंडित यांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त करत कामगार विभागाकडे मोठ्या कारवाईची मागणी केली आहे. ते म्हणाले “थिंक टेक्नॉलॉजी इंडिया प्रकरणात ७०० हून अधिक कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. इथे फ्रेशर्सकडून लॅपटॉप आणि नोकरी देण्याच्या नावाखाली सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून आधीच लाखो रुपये उकळले गेले. पैसे घेऊनही त्यांना ना पगार दिला, ना त्यांची ठेव रक्कम परत केली. कामगार विभागाने आता विशेष मोहीम राबवून अशा दोषी कंपन्यांच्या मालकांना जेलमध्ये टाकले पाहिजे.”
कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक झालेल्या या टाळेबंदीमुळे शेकडो तरुण इंजिनिअर्सच्या डोक्यावर कर्जाचे डोंगर उभे राहिले आहेत. पगार न मिळाल्यामुळे महिन्याचा घरखर्च भागविणे, रूमचे भाडे भरणे आणि शैक्षणिक अथवा वैयक्तिक कर्जाचे हप्ते (EMI) वेळेवर भरणे आता या तरुणांना अशक्य झाले आहे. या प्रचंड मानसिक त्रासामुळे अनेक फ्रेशर्स आणि त्यांचे कुटुंबीय नैराश्यात गेले आहेत.
दरम्यान, संतप्त झालेल्या शेकडो कर्मचाऱ्यांनी एकत्र येत हिंजवडी पोलीस ठाणे आणि कामगार विभागाकडे धाव घेऊन लेखी तक्रारी दाखल केल्या आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून कामगार उपायुक्त निखिल वाळके यांनी या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर कसून तपासणी सुरू असून, नियमानुसार कंपनीचे बँक खाते आणि मालकावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सांगितले.
नाशिक IT कंपनी अत्याचार प्रकरणात नवा ट्विस्ट; घटनाक्रम समोर…
पुणे! IT कंपनीत काम करणाऱ्या शुभदा हिला कृष्णाने स्माईल दिली अन्…
पुणे शहरात IT कंपनीतील युवतीवर कोयत्याने वार करून सहकाऱ्याने केला खून…
पुणे! आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याने पत्नीच्या वाढदिवशी घेतला जगाचा निरोप…
नामांकित कंपनीत नोकरी पाहिजे? अशी जाहिरात पाहिली असेल तर थांबा…

