
अमरावतीतील रुग्णालयाच्या आगीत होरपळून ३ अर्भकांचा मृत्यू…
अमरावती: अमरावती येथील जिल्हा महिला रुग्णालयात लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्यानंतर, रुग्णालयाची नियमित अग्निसुरक्षा तपासणी (फायर ऑडिट) होत होती आणि या वर्षीच्या तपासणीसाठीही अर्ज केला होता, अशी माहिती अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी दिली.
जिल्हा महिला रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील नवजात अतिदक्षता विभागात पहाटे सव्वा तीन च्या सुमारास आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, व्हेंटिलेटरमधून ठिणगी पडून ही आग लागली. या घटनेत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला, तर अन्य ३६ मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
अनिवार्य अग्निसुरक्षा तपासणी टाळण्यात आल्याचे आरोप फेटाळत, प्रशासनाने सांगितले, की आता ज्या उपकरणामुळे आग लागली, त्यावर तपास केंद्रित करण्यात आला आहे. रुग्णालयाच्या अग्निसुरक्षा अनुपालनाबाबतच्या प्रश्नांना उत्तर देताना आशिष येरेकर म्हणाले, की नोंदींवरून नियमित ऑडिट केल्याचे दिसून येते. रुग्णालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत शाखेकडे नवीन ऑडिटसाठी यापूर्वीच अर्ज केला आहे. गेल्या वर्षीचे फायर ऑडिट करण्यात आले होते आणि चालू वर्षासाठीच्या फायर ऑडिटसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत शाखेकडे अर्जही केला आहे. आपण स्वतः कागदपत्रे पाहिली आहेत, त्यामुळे फायर ऑडिट टाळण्यात आल्याचे दिसत नाही, असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, की आमचा मुख्य मुद्दा उपकरणे, विशेषतः ज्या युनिटमुळे स्वयंचलित सूचना (अलर्ट) आली, तो आहे आणि त्यात नेमका काय दोष आहे हे आम्हाला तपासावे लागेल. आम्ही आमचा तपास आधीच सुरू केला आहे आणि जर कोणतीही प्रशासकीय चूक उघडकीस आली, तर कोणालाही सोडले जाणार नाही. आम्ही यात सामील असलेल्या प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करू. तथापि, जर कंपनीच्या उपकरणांमध्ये दोष असेल, तर आम्ही कंपनीवरही कठोर कारवाई केली जाईल.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आणि हा प्रकार ‘अत्यंत हृदयद्रावक’ असल्याचे म्हटले आहे. पीडितांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आणि या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
काल रात्री अमरावती येथील जिल्हा महिला रुग्णालयात लागलेल्या आगीत तीन मुलांच्या मृत्यूची घटना अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश आरोग्य प्रशासनाला देण्यात आले आहेत. या घटनेसाठी जबाबदार असलेल्यांवर कठोरतम कारवाई केली जाईल. आरोग्य मंत्री आणि सचिव या दोघांनाही आजच अमरावतीला भेट देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे फडणवीस म्हणाले.
उपकरणातील बिघाडामुळे आग लागली का, याची अधिकारी तपासणी करत असताना, रुग्णालयात दाखल असलेल्या अन्य मुलांच्या नातेवाईकांनी दावा केला आहे, की आग लागली तेव्हा वॉर्डमधील पाण्याचा फवारा मारणारी यंत्रणा कार्यरत नव्हती.
त्यांच्या मते, आग लागताच यंत्रणा आपोआप कार्यान्वित व्हायला हवी होती. हे आरोप या घटनेच्या सुरू असलेल्या तपासाचा भाग असण्याची शक्यता आहे.
कुटुंबातील सदस्यांनी सांगितले, की त्यांना आगीचे नेमके कारण माहित नव्हते, परंतु वॉर्डमध्ये आगीच्या ज्वाला पसरत असताना आणि पालक आपल्या मुलांना वाचवण्यासाठी धावत होते. अनेक नातेवाईकांनीही या दुर्घटनेसाठी रुग्णालय प्रशासनाला जबाबदार धरले आणि उत्तरदायित्वाची मागणी केली.

