
लष्करातील बडतर्फ जवान चंदू चव्हाण यांच्या मागण्यात आहेत तरी काय?
(संतोष धायबर santosh.dhaybar@gmail.com)
पुणे : पाकिस्तानातून भारतात परतलेले आणि भारतीय लष्करातून बडतर्फ केलेले जवान चंदू चव्हाण हे गेल्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी आंदोलन करत असून, त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. व्हिडिओमधून चंदू चव्हाण यांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्स दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया नोंदवत आहेत. पण, त्यांच्या नेमक्या मागण्या आहेत तरी काय? याबाबत त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी www.policekaka.com सोबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
चंदू चव्हाण म्हणाले, ‘देशासाठी पाकिस्तानमध्ये तीन महिने २१ दिवस यातना भोगल्या आहेत. लष्कराची ११ वर्षे सेवा केल्यानंतर मला बडतर्फ करण्यात आले. मला कुठल्याही प्रकारची पेन्शन लागू करण्यात आलेली नाही. त्यामुळे माझ्यावर कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. घरात लहान मुलगा आहे. न्यायाची भीक मागण्यासाठी रस्त्यावरच आंदोलन सुरू केले आहे. पण, जवानांच्या विषयांकडे कोणीही लक्ष देत नाही. माझा लढा हा एकट्यासाठी नाही तर देशातील लाखो जवानांसाठी आहे. देशात जवानांचा सन्मान करण्याचे सोडून उपरे असल्यासारखी वागणूक दिली जात आहे. दुसरीकडे पाकिस्तानमधून आलेल्या सीमा हैदर हिला पायघड्या घातल्या जात आहेत. आतंकवाद्यांना मुख्य प्रवाहात घेतले जात आहे. पण, आम्ही देशासाठी लढूनही आम्हाला ना पेन्शन ना कुठे नोकरी मिळत. कारण, लष्करातून बडतर्फ केल्यामुळे खासगी कंपन्यांमध्ये नोकरी मिळत नाही. मग, अशा वेळी करायचे तरी काय? आम्ही देशासाठी लढून असा काय गुन्हा केला आहे, हेच समजत नाही. कुटुंब चालवायचे कसे? असा प्रश्न पडला आहे. जवळ पैसे नाहीत, काम करावे तर तेही मिळत नाही. सरकार कोणतीही मदत करायला तयार नाही. खूप काही प्रश्न आहेत.’
‘देशातील बडतर्फ जवानांच्या मागण्यांसाठी लढा सुरू आहे. माझ्या मागे कोणतेही संघटन नाही. सरकारला निवेदने देऊन थकलो आहे. सरकार कोणतेही उत्तर देत नाही. एका गरीब कुटुंबातील मुलगा असल्यामुळे सरकार लक्ष देत नाही. अन्यायाला सामोरे जात आहे. देशातील अनेक जवानांवरील कलंक मिटविण्यासाठी आणि विविध मागण्यांची पूर्तता करण्यासाठी आंदोलनं करत आहे. एकाकी लढा देत असताना माझ्यावर गुन्हा दाखल केला जात आहे. सरकार माझी बाजूच ऐकून घेत नाही. सरकारने मागण्यांचा तरी विचार करायला हवा. खिशात पैसा नसल्यामुळे दुहेरी संकटात सापडलो आहे. यामुळे अनेकदा बोलताना संयम सुटतो. पण, एक जवान कधीच हार मानत नाही. हार न मानता माझा लढा सुरूच ठेवणार आहे, असेही चंदू चव्हाण यांनी म्हटले आहे.
जवान चंदू चव्हाण यांच्या मागण्या पुढीलप्रमाणे…
१) जवानांना चुकीच्या पद्धतीने सेवेतून बडतर्फ करू नये. यासाठी ओडिओ, व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हावी.
२ सेवेतून बडतर्फ केलेल्या जवानांना पेन्शन मिळावी, त्यांनी जोपर्यंत देशाची सेवा केली आहे त्याचा मोबदला मिळावा.
३) लष्करातून बडतर्फ केल्याने पोलिस व्हेरीफिकेशेमध्ये बडतर्फ येत असल्याने नोकरी मिळत नाही. त्यामुळे भारतीय संविधानातील आर्टिकल १६ प्रमाणे त्यांना काम करण्याचा अधिकार आहे, त्यासाठी आर्टिकल २१ प्रमाणे राज्य सरकारने बडतर्फ जवानांना आदर सन्मान देऊन शासकीय सेवेत घ्यावे.
४) बडतर्फ केलेल्या जवानानंना एक्स सर्विस मॅनचा दर्जा देण्यात यावा.
५) देशातील बडतर्फ केलेल्या जवानांची राज्य व केंद्र सरकारने आकडेवारी जाहिर करावी.
दरम्यान, पाकिस्तानमधून परत आलेले आणि भारतीय लष्करातून बडतर्फ केलेले चंदू चव्हाण यांची लष्करामध्ये ११ वर्षे नोकरी झाली आहे. चंदू चव्हाण यांची जीवन जगण्यासाठी पेन्शन सुरू करावी, ही प्रमुख मागणी आहे. लष्करातून काढल्यानंतर पेन्शन नाही, नोकरी मिळत नाही मग करायचे काय? असा सवालही चंदू चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.
चंदू चव्हाण यांना पाकिस्तानने पकडले होते. पाकिस्तानमध्ये ते ३ महिने २१ दिवस होते. भारत सरकाने त्यांची सुखरूप सुटका केली. पण, लष्करामधून नुकतेच त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. लष्कराच्या वरिष्ठांकडून सतत आरोप प्रत्यारोप करत चौकशी लावल्या गेल्या. भारतात आल्यानंतर वरिष्ठांकडे या संदर्भात पत्र व्यवहार देखील केला. मी पाकिस्तान कसा आणि कशासाठी गेलो होतो, हे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगावे म्हणजे जनतेला समजेल तरी. यानंतर माझ्या आक्रोशाचे कारण समजेल, असेही चंदू चव्हाण यांनी म्हटले आहे.
Book Online Shop: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस)
जवान चंदू चव्हाण यांचे धुळ्यात भीक मागो आंदोलन; गळ्यात पाटी, पाटीवर स्कॅनर…
Video : लष्करातील जवान न्यायाच्या लढाईसाठी रस्त्यांवर मागत आहेत भीक…
Video: चंदू चव्हाण यांचे उपोषण तात्पुरते स्थगित; मदतीचे आवाहन…
Video: जवान चंदू चव्हाण यांचे मुंबईत आमरण उपोषण; सरकारचे दुर्लक्ष…
जवान चंदू चव्हाण करणार सहकुटुंब आत्मदहन!
पाकिस्तानी महिला सीमा हैदर हिने विचारला थेट राष्ट्रपतींनाच प्रश्न…
सीमा हैदर करणार राजकारणात प्रवेश? RPI पक्षाकडून…
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार; चकमकीत 4 जवान हुतात्मा…

