राज्यातील पोलिसांच्या सुट्या रद्द; पत्रकात म्हटले की…

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आंतरवाली सराटीमधून मुंबईकडे रवाना झाले असल्यामुळे राज्यभरात देखील मराठा आरक्षणासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन होण्याची शक्यता लक्षात घेता, पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहे. पोलिस महासंचालक कार्यालयाकडून पत्र काढण्यात आले आहे. त्यामध्ये 20 जानेवारी ते 28 जानेवारीपर्यंत सर्व पोलिस अधिकारी, अमलदार यांच्या साप्ताहिक सुट्टीसह सर्व प्रकारच्या सुट्ट्या (वैद्यकीय रजा वगळून) रद्द करण्यास घटक प्रमुखांना मान्यता देण्यात आली आहे.

मनोज जरांगे आज (शनिवार) मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. आंतरवाली सराटीमधून निघालेल्या मनोज जरांगे यांच्यासोबत लाखोंचा जनसमुदाय देखील पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुंबई आंदोलनावर जरांगे ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नसल्याचे जरांगे म्हणाले आहेत. विशेष म्हणजे जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

पोलिस महासंचालक कार्यालयाकडून काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जालना ते मुंबई असा संभाव्य पदयात्रा करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ राज्यात ठिकठिकाणी मोर्चे, आंदोलने करण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्या अनुषंगाने राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणेकरिता तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये या करिता सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आवश्यक बंदोबस्तासाठी 20 जानेवारी ते 28 जानेवारी या कालावधीत खालील नमुद घटकांमधील सर्व अधिकारी व अंमलदार (कार्यकारी व अकार्यकारी पदावरील) यांच्या साप्ताहिक सुट्टीसह सर्व प्रकारच्या रजा (वैद्यकीय रजा वगळून) बंद करण्यास घटक प्रमुख यांना मान्यता देण्यात येत आहे. तसेच घटकातील साप्ताहीक सुट्टी बंद करताना उपरोक्त संदर्भातील शासन निर्णयाचे तंतोतंत पालन करावे. तरी, घटक प्रमुख यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणेकरिता सर्वोतोपरी दक्षता घ्यावी,असे म्हटले आहे.

पोलिस महासंचालकांच्या पत्रानंतर अहमदनगर पोलिस दलातील पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय सुट्ट्या वगळता इतर सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्याचा आदेश काढण्यात आला आहे. अहमदनगर पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘अहमदनगर जिल्हयात 21 जानेवारी ते 22 जानेवारी या काळात मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी ते मौजे कोळगाव (ता. गेवराई), मीड सांगवी, पाथडी, तीसगाव, करंजी घाट, बाराबाभळी, भिगार, जी पी ओ नौक, केडगाव, सुगा, वाडेगव्हाण, गव्हाणवाडी असा अहमदनगर जिल्ह्यातून प्रवास करुन पुणे मार्गे मुंबईतील आझाद मैदान असा मराठा आरक्षण अनुषंगाने पायी दिंडी करणार आहेत. त्याकरीता जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडु नये या करीता कायदा व सुव्यवस्था व सुरक्षिततेच्या दृष्टीने बंदोबस्तासाठी जिल्ह्यातील सर्व पोलिस अधिकारी,अंमलदार यांच्या साप्ताहिक सुट्टी, सर्व प्रकारच्या रजा (वैद्यकीय रजा वगळून) 20 ते 22 जानेवारी असे एकुण 3 दिवस बंद करण्यात आले आहे. तर, सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, सर्व पोलिस स्टेशन व सर्व शाखा प्रभारी अधिकारी, पोलिस महासंचालक यांच्या पत्राचे अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करावी.’

मराठा आंदोलनानंतर गृहविभागाचे पोलिसांना महत्त्वाचे आदेश…

जालना लाठीचार्ज प्रकरणी आंदोलकांवर गुन्हे दाखल; पोलिसही जखमी…

नवले पुलावरील जाळपोळप्रकरणी 400 ते 500 जणांवर गुन्हे दाखल…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!