
मुंबईत 2006 साली 7 स्फोट, 209 जणांचा मृत्यू; 12 आरोपींची निर्दोष सुटका…
मुंबई: मुंबईत 2006 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात उच्च न्यायालयाने आज (21 जुलै) महत्त्वाचा निकाल दिला. मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या या साखळी बॉम्बस्फोटात 209 जणांचा मृत्यू झाला होता. तर 800 हून अधिकजण जखमी झाले होते. मात्र, उच्च न्यायालयाने याप्रकरणातील सर्व 12 आरोपींना निर्दोष सोडल्याने तपास यंत्रणांना मोठा झटका बसला आहे.
2015 साली विशेष न्यायालयाने याप्रकरणातील 12 आरोपींना दोषी ठरवले होते. यातील पाच जणांना फाशी आणि सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. या शिक्षेला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पोलिसांनी आपल्याला मारहाण करुन जबाब नोंदवले असा आरोप याप्रकरणातील दोषींनी केला होता. विशेष मोक्का कोर्टाने फैजल शेख,असिफ खान, कमाल अन्सारी, एहतेशाम सिद्दीकी, नाविद खान यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. तन्वीर अहमद अन्सारी, मोहम्मद माजिद शफी, शेख आलम शेख, मोहम्मद साजिद अन्सारी, मुझ्झमील शेख, सोहेल मेहमूद शेख, जमीर अहमद शेख यांना विशेष कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आजच्या सुनावणीला आरोपी येरवडा, नाशिक, अमरावती आणि नागपूर कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लावली हजेरी लावली होती. उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर या आरोपींनी आनंद व्यक्त केला.
न्यायमूर्ती अनिल किलोर व न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाकडून हा निकाल सुनावण्यात आला. मुंबई हायकोर्टाने आपल्या निकालात महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहेत. आरोपींना शिक्षा द्यावी असे पुरावे समोर आले नाहीत. कोर्टाने साक्षीदारांवरही शंका उपस्थित केल्या. साक्षीदारांच्या साक्षी या विश्वासार्ह नसल्याचे मत नोंदवले. बॉम्ब, बंदुका, नकाशे जुळून आले नाही. 2006 मधील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाचा पहिला निकाल 2015 मध्ये आला होता. मोक्का कोर्टाच्या निकालानंतर आरोपीनी हायकोर्टात आव्हान दिले. त्यानंतर आता हायकोर्टाने मागील काही महिन्यांपासून सलग सुनावणी करत आज निकाल सुनावला.
हायकोर्टाच्या या निकालाने एकूणच तपासावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सत्र न्यायालयात 12 आरोपींना दोषी ठरवण्यासाठी योग्य असलेले पुरावे हायकोर्टात टिकले नसल्याने दहशतवादविरोधी पथकाच्या तपाला धक्का बसला असल्याचे म्हटले जात आहे. मुंबईतील लोकल ट्रेन्समध्ये 11 मिनिटांत पाच ठिकाणी स्फोट झाले होते. चर्चगेट ते बोरिवली स्थानकांदरम्यान हे स्फोट झाले होते. या स्फोटांसाठी कुकर बॉम्बचा वापर करण्यात होता. 11 जुलै 2006 रोजी 11 मिनिटांत झालेल्या 7 स्फोटांनी मुंबई हादरली होती. 2015 साली सत्र न्यायालयाने 13 आरोपींपैकी बारा आरोपींना दोषी ठरवत पाच जणांना फाशी तर उर्वरित सात जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.दोषींनी त्यांच्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होत तर राज्य सरकारने फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
पोलिस अधिकारी API अश्विनी बिद्रे प्रकरणी न्यायालयाने सुनावली दोषींना शिक्षा…
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाचा मोठा दिलासा…
कृष्णा आंधळे याची संपत्ती जप्त करण्याचे न्यायालयाने दिले आदेश…
मुंबईत न्यायालयीन सुनावणीदरम्यान अचानक स्क्रीनवर सुरू झाला अश्लील Video…
साताऱ्यात लाच घेणाऱ्या न्यायाधीश प्रकरणात नवा ट्विस्ट, पोलिस अधिकारी…

