
१४ वर्षांपूर्वी पोलिस गोळीबारात मुलगा मृत्यूमुखी पडलेल्या ठिकाणीच पित्याची आत्महत्या…
अहमदाबाद: गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील थांगड पोलीस गोळीबार घटनेत २०१२ मध्ये मृत्यूमुखी पडलेल्या आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी, ज्या परिसरात त्यांचा मुलगा पंकज सुमरा (वय १६) पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला होता, त्याच परिसरात अमरशीभाई सुमरा (वय ५३) यांनी धावत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. गेल्या १४ वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या एका हताश पित्याने त्याच परिसरात आपले जीवन संपवल्याची दुःखद घटना येथे घडली आहे.
कुटुंबीयांनी सांगितले, की अमरशीभाईंनी रात्री थांगड आणि लखमंची दरम्यान हापा-मुंबई ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. त्यांचा संघर्ष सप्टेंबर २०१२ मध्ये थांगडमधील तरनेतार जत्रेदरम्यान दलित आणि भरवाड यांच्यात वाद निर्माण झाला तेव्हापासून चालू होता. हा वाद विकोपाला जाऊन दोन्ही गटांमध्ये हिंसाचार झाला. दंगलखोरांना पांगविण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मेहुल राठोड, पंकज सुमरा आणि प्रकाश परमार हे तीन दलित तरुण ठार झाले होते.
गोळीबाराच्या घटनेने गुजरातला हादरवून सोडले होते. पोलिसांच्या कारवाईवर त्यावेळी गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. ग्रामस्थांच्या वाढत्या संतापाला प्रतिसाद म्हणून, राज्य सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी एक विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले.
एसआयटी पथकाने थांगडला भेट देऊन जत्रेचे मैदान आणि रेल्वे गेटची पाहणी केली. गोळीबार नेमका कुठून सुरू झाला हे निश्चित करण्यासाठी पथकाने घटनास्थळाची पाहणी केली आणि संपूर्ण परिसराचे चित्रीकरण केले.
घटनेला १४ वर्षे उलटून गेली तरी मृतांच्या कुटुंबीयांना अद्याप न्याय मिळालेला नसून तपास अहवालही सार्वजनिक करण्यात आलेला नाही. आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर अमरशीभाई व्यवस्थेशी संघर्ष करत सातत्याने न्यायालयात या घटनेचा पाठपुरावा करत होते.
रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या मुलींना त्यांच्या मृत भावासाठी रडताना आणि शोक करताना पाहून ते पूर्णपणे खचून गेले. या तीव्र आघाताने आणि निराशेने ग्रासलेल्या अवस्थेत, ज्या ठिकाणी त्या तीन तरुणांसाठी स्मारक उभारण्यात आले होते, त्याच परिसरात त्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला.
आत्महत्येची माहिती मिळताच रेल्वे पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील तपास सुरू केला. एका असहाय्य पित्याच्या या दुःखद मृत्यूने राज्यात जुने प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित करण्यात आले आहेत.

